Popular Posts

Wednesday, July 11, 2012

माझी विठाई माऊली



("आईची आषाढी एकादशी"च पुढे चालू...)

त्यामुळे आजही आषाढी एकादशी म्हटलं की तेच आठवतं. दुकानात तुळशीची माळ घेऊन जप करणे, भेळीत कोणी कांदा मागितला तर एकादशीला कांदा कापून पुन्हा हात धुवायचे नि बसायचं. वाड्यातील लहान मुलांचा गलका. जणू चहू बाजूंनी विठ्ठल अंगी झेपवत आहे!


    
       जनी म्हणाली "काळ्या मदत कर रे…" नि तो धावून जातं फिरवू लागला, ज्ञानोबा माऊली म्हणाले "ज्ञान दे रे देवराया..!" नि निवृत्तीच्या रुपात सावळा घन ज्ञानची बरसात घेऊन आला, माझा भाजीचा मळाच माझी पंढरी म्हणत राबणर्या सावतांसाठी खरंच विठू तिथे त्यांच्या ह्ृदयात येऊन राहीला नि सावत्यांच्या मळ्याची सार्थ पंढरी केली! वारकर्यांच्या भक्तिची बातच अलग! पंडीत म्हणाले, देव हवा, तर, हे शिका, ते शिका. योगीजन म्हणाले श्वास हा असा घ्या नि तसा घ्या. साधा माणूस, खरंच कमी बुद्धीचा तो, म्हणूणच तर साधा, बिचार्याला काही कळाले नाही नि असाच पडला. त्याच्यासाठी राउळीतली देवाच्या मुर्तीचे दर्शन महागले नि मग देवाला मिळवणे खरंच अवघड असते, हे प्रत्ययाला आले. खुद्द ज्ञानवातार ज्ञानोबांनाही " ज्ञानोच्चारणाचा अधिकार आहे" पुरावा द्यावा लागला. सुर्याला जाऊन म्हणावे "सिद्ध कर, तूला प्रकाशण्याचा अधिकार आहे", वायुस म्हणावे "पुरावा दे की तुला वाहण्याचा अधिकार आहे", तसे ज्ञानियांच्या राजाला विचारले "सिद्ध कर, तुला ज्ञानमिळवण्याचा अधीकार आहे..!" सोशिकतेची मुर्ती, नम्रतेची सावली, अहंकराचा वारा न लागलेला राजहंस माझा… मनी आणता तर विश्वरुप दाखवता झाला असता! पण तेही सहन केले. "अहो रुपम् , अहो ध्वनिम् " म्हणणार्या विद्वानांना पुरावे दिले. पोटासाठी भाकरी दिली नाही, तरी तापहीन मर्तंडांचे बिकट व्रत स्विकारले. त्यांचे आतडे पिळवटून निघाले ते परपीडनेच्या दुःखाने. गांजलेला "साधा माणूस." न देवळात जायची संधी ना ज्ञान मिळवण्याची संधी. प्राकृतभाषेची घुसमट. अंगावर सुंदर दिसणारे कपडे घालावेत नि त्या कपड्यांनीच आपल्यासाठी पिंजरा करून ठेवावा, आतला माणूस कैदी बनावा तशी देवाची झालेली गत. देवभाषाच देवासाठी पिंजारा झालेली. कदाचित, विठ्ठलालाच त्याच्या भक्तांची ओढ अनिवार झाली काय, तो गरजला… गरजला, तो अशा अभिनिवेशाने गरजला की जळमटं तुटली, पिंजला छिन्नविछिन्न होऊन पडला…

     कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा। चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा ।।

दिव्य ज्योतीच जणू अवतरली.. दर्शयामास पर्थाय परमं रुपमैश्वरम्, चा अनुभव धरत्रीने एकदा घेतला होता कुरुक्षेत्रावरती... तद्नंतर युगांपश्चात मरहठ्ठ्यांच्या भूमीत नेवासे गावी तिने दुसर्यांदा तोच दिव्य अनुभव घेतला... यावेळी फक्त पार्थ बदलला होता. तो एका समाजाच्या रुपानं उभा होता.  "ज्ञानेश्वरी"चा जन्म झाला. किती किती वचने दिली होती ह्ृषिकेशानं, ती सारी सारी यावेळी पुर्ण केली.




यो यथा माम् प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्… तुम्हाला मी हवाय, प्राकृतात हवाय? हा मी आहे! तुम्ही गांजले आहत, काळवंडले आहात.. मी सुद्धा का गोरा राहू..? तुम्हाला रहायला घर राही, परचक्र आहे… हा मी विटेवर आलो… भजनाला साधन नाही.. ती पहा प्रचंड चंद्रभागा, ते तिचे वाळवंट… उचला ती शिंपल्याची चिपळी नि धरा ताल… जानईला माया मिळत नाही... हे पहा जने, मी हा कृष्ण झालो... तू माझी राधा... तो पहा चोखोबा ओरडतोय... "धाव घाली विठू आता। चालू नको मंद। बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।" ... वेगळा का आहेस रे चोखा तू.... हा पहा मी आलो तुझ्या हाडामांसात रहायला... नाथांच्या वर्तनास शास्त्राधार नाही म्हणतायेत... हा पहा गुरुदेवदत्त म्हणून त्याच्या पाठीशी उभा ठाकलो... प्रेम नाही, सगळीकडे द्वेष नि असुया आहे, जातीची उतरंड आहे, लेकरांना माया हवी.. हा पहा मी विठा"ई" झालो… आणि ती माझी ज्ञानोबा"माऊली"… द्वेष करणारे ही माझेच नि द्वेष केला गेलेली ही माझेच… दुष्कृत: असं कोणी नाही, म्हणून मी विनाशाची भाषा करणार नाही… मग काय म्हणू म्हणाता…? मी म्हणतो "जे खळांची व्यंकटी संडो, तया सत्कर्मी रति वाढो"..! माझा संताप होतो असं नाही, पण माझं तेज सहन होणार नाही तुम्हाला, ते मीच झेलतो, माझी पाठ मीच तापवतो पण गरम गरम मांडे तुम्हाला देतो… भावार्थदिपिकेचे मंाडे, अमृतातेही पैजा जिंकणारी प्राकृताची गुळवणी सोबत आहे... ज्ञानामगे धावणार्यांसाठी निवृत्ती उभा आहे, सहनशील आईची कमी भासणार्यांसाठी मी उभा आहे ज्ञानेश्चराच्या रुपाने... भक्तीयोगाचे उदाहरण म्हणून सोपानदेव आहेत नि मनीचा  निरागसपणा  गेला नसेल तर कोवळ्यामनाची प्रफुल्ल आकाशी उडणारी माझी मुंगी मुक्ताई आहे…

ज्ञानदेवे रचिला पाया । उभारले देवालया ।।
 नामा तयाचा किंकर । तेणे केलासे विस्तार ।।
 जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ।
 भजन करा सावकाश । तुका झालासे कळस ॥



परिसस्पर्श...


(ही दोन्ही छायाचत्रे: मित्रवर्य विश्वजीत गायकवाड , सर्व हक्क त्याच्याचकडे,  परिसस्पर्श... हे नावही त्यानेच दिले आहे.)











    खरंच, किती नशिब आहे माझे, अशा महाराष्ट्रात जन्म घेतला की जिथे सोळा वरसाचं मिसरूड न फुडलेलं पोरगं, प्रचंड मोठ्या गुहेत बसून विश्वात्मकाचं ज्ञान देतं नि वयानं पिकलेल्या कापर्या भुवईखाली चिंब ओला झालेले नयन झाकतं नव्वदीचा म्हातारा त्याच्या पायाला "माऊली, माऊली.." म्हणून आर्त मिठी मारतो..! जगाच्या पाठीवरला हा चमत्कार प्रत्येक आळंदी भेटीतमधे मानाच्या गाभार्यात कस्तुरीच्या सुगंधाचं वादळ आणतो… कस्तुरीचा सुगंध कारण, माऊलींची समाधी पाहीली की त्या दिव्य विद्वत्तेपुढे मी नतमस्तक होतो नि हरीपाठाची एक एक ओवी "अरे, ईथंच मी आहे… कुठं शोधत भिरभिरतोयेस…" म्हणत एक  सुगंधी वातावरण तयार करते नि तेच बाहेर येऊन "ताटी उघडा ज्ञानेश्वरा.." अशी मुक्ताईची हाक आठवली, की आम्ही (अजूनही..!) कसं वागतो नि कसं माऊलीलाच वाळीत टाकतो, हा विचार वादळ उठवतो…!

    अशीच प्रत्येक आषाढी एकादशी असंख्य विचारांची. पंढरपुरीच्या रायाला भजणे केवळ आंतरिक आनंद नाही, ना केवळ अध्यात्मिक, तर आईच्या एकादशीला दुकानासाठी कांदाकापणर्या हातांचा किंचीत कांद्याचा वास लागलेल्या जपमाळेने शिकवलेला कर्मसिद्धांत आहे, माऊलींच्या पसायदानातील ओवीन् ओवीमधे भरलेला सामाजिक जाणिवेचा नि सोशिक ऐक्याचं (अस्फुट… कारण अजूनही आम्ही ते नीट ऐकलंच नाही..!) उच्चारण आहे, तुकोबा-नाथांनी दिलेल्या शिकवणूकीचा पुनरुच्चार आहे… हरीभेटीचा सोहळा तर तो आहेच आहे, पण कुठेतरी भगवंताने गीता सांगितल्यानंतर, आमच्यावर आलेल्या शिकवणूक आचरणात आणायच्या जबाबदारीची ती एक आठवणही आहे…!

।। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ।।





(विश्वाची सोडून इतर छायाचित्रे गुगल काकांकडून घेतली आहेत. त्यांच्या त्यांच्या हक्कधारकांचे आभार)

आईची आषाढी एकादशी


  
दहा-एक दिवसांपुर्वी आषाढी एकादशी झाली. विठ्ठलाचे भक्त  विठूमाऊलीला कडाडून भेटून, भौतिकतेकडे माघारी परतू लागले. प्रत्येक वेळी पंढरीची वारी सुरू झाली की मन थरारून ऊठते. खरं सांगायचं तर, माझ्या आजोबांनंतर कोणी वारी केली नाही. मी कधी वारीसोबत दिवे घाटातही गेलो नाही, ना कधी पंढरपुर-आळंदीला, अगदी देहूला सुद्धा आषाढी एकादशीला गेलो नाही. आईला आमच्या शाळा-कॅालेजाची नि करियरची जास्त काळजी होती (तिथे एकही खाडा केला नाहीये!). मला चिपळ्या वाजवता येत नाही, माझं मृदुंग वाजवणं हे मृदुंग बडवणं असतं. म्हणून मोठ्या नशिबवान लोकांना मिळतात तसे वारीमधे सामिल होणे, वारकर्यांच्या त्या अथांग भक्तिसागरात सामिल होणे, आषाढी एकादशीच्या महापवित्र मुहुर्तावर काळ्यासावळ्या विठाईचे दर्शन होणे असा एकही प्रसंग, जो मनाच्या देव्हार्यामधे कायमसाठी धुपारती करीत नि फुलपाकळ्या-तुळशीने अभिषेक करीत ठेवता येईल, माझ्यासोबत अजूनतरी घडला नाहीये. पण, मला एकादशीची हुरहुर माझ्या मध्यमवर्गिय घरातील भाबड्या एकादशीची आथवण करून देते. आम्ही सगळे माळकरी. वारी सुरू झाली की घरात साकळचा हरिपाठ बाबा मोठ्यांदी म्हणतात. एरवी सार्यानी आपपाल्या सोईने झोपाने, पण याकाळ मात्र पहाटे उठायचं बंधन. घरच्या विठ्ठलाच्या मुर्तीला एरवी केवळ अष्टगंध. पण या काळात, वेळ मिळाला की आत्याने पाठवलेल्या चंदनाचे एखाद-दुसरे बोटही उमटायचे. विठोबा-रूखमाईला दोन फुले जास्तीची  मिळायची. गुरुपौर्णिमा, दिवाळी, शिवरात्री नि वारीचा काळ असा जयावेळी फुलवाल्या अक्काना आई ठणकावून सांगायची

 "अक्का, चार फुलं जास्तीची द्या. वर्षभारात दोन-तिनदाच असं सांगतो आम्ही, खातं सुद्धा नेटकं असतं. कधी सतावत नाही. आणि मग

 "अगं बाई, म्हतारीला असं सगळ्यांकडे सांगायल लागले तर बंद करायला लागेल धंदा", असं उत्तर देऊन अक्का जायच्या.

 मला वाटायचं उद्या कसं होणार. पण दुसर्या दिवशी अक्का माझ्याकडे फुलं देताना "दादा, घे! तुझ्या आईची विठ्ठलाची फुलं आहेत". ती बाबांच्या पुडी पुजेच्या भांड्यात सोडताना दिसायचे, की त्यात दोन-चार मंजिर्या नि तुलसीपत्रही आहेत! मला गंम्मत वाटायची. पण विठ्ठलावर पहिल्या तुलसी पडायच्या, त्या वाड्याच्या अरुंद बोळीत आईने जगवलेल्या वृंदावनातील तुळशीच्या!

 अक्काची तुळस बाहताना "अक्काच्या नातीचं नि मुलाचं नीट होऊ दे" असं आई कायम पुटपुटणार. बाबा गेली की, ती विठ्ठलाच्या मुर्तीजवळ खुडखुड करायची. नुसतं बोटानं लावलेला गंध तिला आवडत नाही. कायम चित्रात दिसतो, तसा पांढरा, पिंडीचा आकार नि मधे काळेशार बुक्क्याचे बोट काढआयचा तिचा हट्ट असायचा. तिला तिच्या वडलांनी शिवले होते ते कसे करायचे. पण आम्ही कितीही हट्ट केला, तरी आम्हाला तो गंध निषिद्ध! केवळ नाम. कारण, तसा गंध केवळ देवालाच लावायचा असतो, हे साधे कारण. रोज शाळेतून आल्यावर म् त्यांच्या लहानपणीच्या किर्तनाच्या-हरीपाठाच्या कहाण्या. एकादशीला तर काय, तिला तिचा वाढदिवसच असल्यासारखा वाटतो! अक्का दुपारी येतात, "घासभर का होईना तुझी खिचडी दे" असं म्हणत. बाबांचा जास्तीचा जप नि मग पोटापाण्याचे काम. आईचे काम एकच, घरी जमेल तेवढ्या लोकांना बोलवायाचे नि खिचडी, रतळ्याचा शीरा खाऊ घालायचा. कोणी गरीब, उपाशी दिसला की जवळ जाऊन खिचडी-शिरा-दुध, पाणी द्यायचे. ती स्वतः एकभुक्त. शेजारच्या बाया प्रसाद असल्यासारखं घरी येऊन खिचडी घेणार. मुलगा चौथीत नापास झाला असला की "भेळवाल्या काकुंच्या घरी जा नि खिचडी खा. जरा तरी अक्कल येईल!" असं म्हणत मुलांना आमच्या घरी धाडणार्या बायका मी पाहील्या आहेत. एकदा तर, संध्याकाळी, मी क्लासवरून घरी आलो नि पाहीले दारात प्रचंड मोठी रांग होती, लहान मुलांची. रस्ता काढत आतमधे गेलो नि पाहीले तर काय, आमच्या आईसाहेब टेबलावर बसल्या होत्या नि प्रत्येक मुलाला नाम काढून देत होत्या. मुलं-मुली सगळेजण काकू नाम औधून देतायेत म्हणून शेजारच्या वाड्यावरून आले होते, काहीजण क्लासवरून येताना मित्राने सांगितले म्हणून तसेच रांगेत लागले होते! "हे काय गं?" असं विचारलं तर "काही नाही रे! शेजारच्या विकीला नाम काढून दिला मी, दुपारी तो खिचडीसाठी आला तेव्हा न मग त्याचे मित्र पण आले. मघ आख्खा वाडा आला, मग हे सारे लोक आले. म्हटंलं मुलं आहेत, खुश होतील म्हणून नाम काढतेय नि थोडी खिचडी देतीये!" अक्षरशः मला "आवरा" झालं! रात्री मुद्दामचं तिला डिवचलं "का गं, एरवी दुकानात एक पैचं नुकसान होऊ देत नाहीस आणि आज काहीच केलं नाहीस?"। तिनं खुप छान उत्तर दिलं "दादा, मुलंच आहेत ती. मला छान वाटतं त्यांच्यात रमायला. एरवी उनडक्या करतात आज नाम लावून 'विट्टल विट्टल' म्हणतातयेत, ते दिवसभरच का होईना त्यांनी केलेलं चांगलं काम नाही का? कदाचित अशीच सुधरतील. तात्या सांगायचे की विठ्ठल तुकारामांच्या बायकोच्या मदतीला आला तो लहान मुलगा बनून आणि दामाजीचं कर्ज चुकवलं ते ही लहान मुलगा म्हणूणच. मला आपलं छान वाटतं त्याला असं लहान म्हणूण पाहणं!"

   
मला नवल वाटलं की हिला हरीपाठ माहीत नाही. ही कधी आम्हाला इतरांसोबत वारीला जाऊ देत नाही, म्हणते तेवढा वेळ अभ्यास करा, ते जास्त पुण्याचं आहे. पुण्यात वारी येते ती पहायला तिने कधी पाठवले नाही, खर्च नको म्हणून. कोणी वारकरी दारी आला तरी ती त्याला ताज्या पोळ्या देत असे, पण एखाद्या म्हातार्या नसलेल्या वारकर्याने तिला भेळ मागीतली ती नाही म्हणे. "माझा तो व्यवसाय आहे. त्या तरण्या वारकर्याने आपले पैसे कमवावे नि जिभेचा चटका पुरवावा. त्याला भुक असेल तर मी भाजी टाकते!"

  "मग म्हातार्यांना का देतेस?"

   "कारण, खुपसारे म्हातारे लोक गावाकडचे असतात. कित्येकांना जाच असतो. आपल्या गावात नाही का त्या अमुक अमुकची सुन असा असा जाच करते? त्यामुळे कितीही कडक साधना करणारा असला तरी असा पिडलेला असेल तारी अन्नाची वासना असते. नि ते खरंच इतके धनिक नसतात की विकत घेतील. तर पुरवावी आपण ती वासना. तिथं विठ्ठलापर्यंत कुठं गार्हाणं करू द्यावं त्याला भेळीसाठी..!"
   साधं सुधं लॅाजिक तिचं. 
  
एका आषाढीला, मी फर्ग्युसनमधे एकदा कार्यक्रम होता, म्हणून नाम लावत नव्हतो, एकादशीला, आणि तिने जबरदस्ती गंध लावून पाठवलं. "माळकरी आहे, याची लाच काय बाळगायची!". पण परत कधी असं केलं नाही बुवा मी!

   त्यामुळे आजही आषाढी एकादशी म्हटलं की तेच आठवतं. दुकानात तुळशीची माळ घेऊन जप करणे, भेळीत कोणी कांदा मागितला तर एकादशीला कांदा कापून पुन्हा हात धुवायचे नि बसायचं. वाड्यातील लहान मुलांचा गलका. जणू चहू बाजूंनी विठ्ठल अंगी झेपवत आहे! तिनं शिकवलं ही अशा रितीने की घरापासून कितीही दुर असलो, तरी पंढरीच्या भेटीची इ्छा झाली नि एखादा तास जास्तीचा अण्यास केला किंवा कोणा उपाशी माणसाला पोटभर खायला दिले, तरी नजरेसमोर आईचा विठ्ठल आलाय नि त्याला पुरुषसुक्ताचा अभिषेक घातलायंसं वाटतं..!



(शेवटची दोन छायाचित्रे आमचे मित्रवर्य छायाचित्रकार विश्वजीत गायकवाड यांची आहेत, सर्व हक्क त्यांचेच असून त्यांच्या परवानगीशिवाय ती वापरू नयेत.
विश्वाची सोडून इतर छायाचित्रे गुगल काकांकडून घेतली आहेत. त्यांच्या त्यांच्या हक्कधारकांचे आभार)
... हाच दुवा पुढे चालू ठेवतोय...